चंद्रपूर, दि. ०४ : राज्यामध्ये अनुकंपाधारकांच्या नोकरीचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या कुटुंबांना आर्थिक व भावनिक मदत करणे ही शासनाची जबाबदारी आहे, या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरणात्मक निर्णय घेतला. त्यामुळेच आज संपूर्ण राज्यात एकाचवेळी अनुकंपाधारक व सरळसेवा भरती उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येत आहे. शेवटी नोकरी ही उपजिविकेचे साधन असून कुटुंबासाठी अतिशय मोठा आधार आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे अनुकंपाधारक व सरळ सेवा भरती उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.